
आयपीएलच्या १२ व्या सीझनमधील अंतिम सामना येत्या १२ मे रोजी हैद्राबादचा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होत असून या सामन्याची तिकिटे फक्त दोन मिनिटात विकली गेली आहेत. यामुळे बीसीसीआयच्या पारदर्शीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आयपीएल अंतिम सामन्याची तिकिटे दोन मिनिटात खतम
मिळालेल्या माहितीमुसार हैद्राबाद मधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमची क्षमता ३९ हजार प्रेक्षकांची आहे. इतकी सगळी तिकिटे दोन मिनिटात संपलीच कशी असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांनी विचारला आहे. यावर बीसीसीआयने उत्तर दिले पाहिजे अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे बीसीसीआयआय ने कोणतीही पूर्वसूचना न देताच सामन्याच्या तिकिटांचे बुकिंग ओपन केले होते. क्रिकेट तज्ञांच्या माहितीनुसार प्रत्यक्षात २५ ते ३० हजार तिकिटेच विकली गेली आहेत. पण विक्री सुरु झाल्याचा पत्ता क्रिकेट तज्ञांना लागला नाही. हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीतील काही सदस्यांनीही या तिकीटविक्रीबाबत बीसीसीआयच्या पारदर्शीपणावर शंका उपस्थित केल्या आहेत. इतक्या झटकन केवळ दोन मिनिटात तिकिटे संपली कशी असा त्यानाही प्रश्न आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १ हजार, १५००, २ हजार, २५००, ५ हजार, १० हजार, १२५००, १५ हजार, आणि २२५०० अश्या तिकिटांच्या किमती होत्या. ज्या वेबसाईटकडे फायनल तिकीट विक्रीचे हक्क होते, त्यांनी फक्त ५ हजार रुपये किमतीपर्यंतचीच तिकिटे विकली आहेत मग बाकीच्या तिकिटांचे काय झाले याचे उत्तर क्रिकेट प्रेमीना हवे आहे.
