प्रशांत किशोर यांच्या दाव्यामुळे आढळराव पाटील आपल्या विजयावर ठाम


पुणे : 17व्या लोकसभेसाठी देशभरात सध्या एकूण सात टप्प्यात होत असून याचे पाच टप्पे पार पडले आहेत. पण मतदान झालेल्या जागांवर कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आप आपली समीकरणे प्रत्येक उमेदवार जुळवत आहे. तर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याच अहवालाचा हवाला देत 90 हजार ते एक लाख मतांनी निवडून येण्याचा दावा शिरूरमध्ये शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे.

शिरूरमध्ये पहिल्यांदाच अमोल कोल्हे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना मिळाल्यामुळे दोन्ही गटांकडून कोणीही जिंकून येऊ शकेल असा दावा केला जात आहे. पण आता मात्र 90 हजार ते एक लाख मतांनी निवडून येऊ असा दावा शिवाजीराव आढळराव पाटलांनी केला आहे. तब्बल एक लाख लोकांचा सर्व्हे प्रशांत किशोर यांच्या टीमने केला आणि हा निष्कर्ष त्यातून आल्याचा दावा आढळराव पाटील यांनी केला.

यासाठी आढळराव पाटील यांनी कोणताही कागदी पुरावा दिला नसला तरी प्रशांत किशोर यांनी थेट सांगितल्याचा दावा केला. आपल्या विजयावर आढळराव पाटील ठाम आहेत. तर विजयाचा दावा अमोल कोल्हे यांच्याकडूनही केला जात आहे.

Leave a Comment