मोदींना देश राजीव गांधींबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यासाठी कधीही माफ करणार नाही


मुंबई – शनिवारी उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपला, असे वक्तव्य केले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विटरमार्फत मोदींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोदीजी, लढाई संपलेली आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे. तुमच्याबद्दलची वैयक्तिक मते तुमची माझ्या वडिलांवर लादल्याने तुमची सुटका होणार नसल्याचे प्रत्युत्तर दिले होते. मोदींच्या त्या वक्तव्यावर कडाडून टीका करण्यात येत असतानाच यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फेसबुक पोस्टद्वारे मोदींच्या त्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी टीका केली आहे. नरेंद्र मोदींना देश दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यासाठी कधीही माफ करणार नसल्याचे म्हणत मोदींच्या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द आकस, सातत्याने खोटे बोलणे आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचे भान नसणे या तीन गोष्टींसाठी ओळखली जात होती. आता त्यात विधीशून्यतेची भर पडली असून मोदी, स्व. राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यासाठी तुम्हाला देश कधीही माफ करणार नसल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment