महिलांच्या डोक्यावरील पदराआडून नाही तर बुरख्याआडून पसरत आहे दहशतवाद


नवी दिल्ली – श्रीलंकेत इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या बॉम्ब ब्लास्टनंतर तेथे बुरख्यावर बंदी घालण्यात आली. त्यानंतर भारतातही बुरखाबंदी व्हावी अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती. आता त्या मागणीवरुन राजकारण पेटले आहे. दरम्यान याच पार्श्वभूमिवर उत्तर प्रदेशातील भाजप आमदार संगीत सोम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपल्या देशात पसरणार दहशतवाद हा पदराआडून नव्हे तर बुरख्याआडून पसरत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने भारतात बुरखाबंदी व्हावी, अशी मागणी केल्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी केलेल्या टीकेननंतर आपल्या मागणीवरुन घूमजाव केले होते. त्यानंतर देखील काही नेते ही मागणी उचलून धरत आहेत. सोशल मीडियावरही याच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर झाल्या. सोम यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये बुरख्याआडून देशभरात दहशतवाद पसरवला जात असल्यामुळे देशाच्या लोकशाहीला धोका उत्पन्न झाला आहे, बोगस मतदान करण्याचाही प्रयत्न यातून झाला आहे. त्यामुळे बुरख्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

बुरखाबंदीच्या मागणीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही टीका केली होती. तर डोक्यावर पदर घेण्यासही बंदी करण्याची मागणी चित्रपट पटकथा, लेखक आणि गीतकार-शायर जावेद अख्तर यांनी केली होती. पण, सोम यांनी त्यांचे नाव घेता कधी डोक्यावरील पदराआडून दहशतवाद पसरला आहे, असा सवाल केला आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सांप्रदायिकता दिसते, असे सोम यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना जे लोक साथ देत आहेत, त्या टुकडे-टुकडे गँगचा तुम्ही प्रचार करता, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनीही शिवसेनेच्या मागणीचे समर्थन केले आहे.

Leave a Comment