सीमेपार जाऊन मोदींनी नाही तर भारतीय लष्कराने केला सर्जिकल स्ट्राईक


नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल घोटाळ्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सीमेपार जाऊन नरेंद्र मोदींनी नाही तर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. आपल्या सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे नरेंद्र मोदी सांगत लष्कराचा अपमान करत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

शनिवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वास यावेळी राहुल गांधी यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर भाजपने 2 कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. पण आमचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुख्य रोजगारीचा मुद्दा आहे. मोदी सरकारने केलेली नोटाबंदीची योजना फसली असून त्याला काँग्रेसची न्याय योजना उत्तर देणार आहे. न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

याचबरोबर, भाजपने मसूद अझहरला देशाबाहेर सोडले, असा आरोप करत मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले. त्याचबरोबर देशातील निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, कारण ते घाबरतात. नरेंद्र मोदी दबाव आला की पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, देशाचा पंतप्रधान कोण असेल, या प्रश्नावर उत्तर देणाना राहुल गांधी म्हणाले, जे देशाचे लोक ठरवतील, मला तो पंतप्रधान मान्य असेल, पण सध्यातरी माझे काम हे देशाच्या संस्थांना वाचवणे आहे.

Leave a Comment