मोदी पुन्हा सत्तेत आले तर देशातील दहा हजार कोट्याधीश देश सोडतील


सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल आर. खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल ट्विट करुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केआरकेने एका रिपोर्ट हवाला देत म्हटले आहे की, जर का पुन्हा पंतप्रधान मोदीजी झाले तर देशातील दहा हजार कोट्याधीश देश सोडून जातील.

कमाल आर खानने भारतीय अर्थव्यवस्था आणि निवडणुका यांच्याबद्दल भाष्य करणारे तीन ट्विट केले आहेत. त्याने पहिल्या ट्विटमध्ये ग्लोबल वेल्थ मायग्रेशनचा हवाला देत म्हटले आहे की, २०१८ मध्ये ५००० भारतीय कोट्याधीश दुबईत वास्तव्यास गेले. ७००० रशियन आणि १५ हजार चीनी कोट्याधीश याकाळात दुबईत शिफ्ट झाले. कमाल खान म्हणतो की, प्रत्येक श्रीमंत व्यक्तीला दुबईसारख्या सुरक्षित स्वर्गात रहावे असे वाटते.

कमाल आर खानने लिहिले आहे की, मोदीजी जर पुन्हा पंतप्रधान झाले तर २०१८ प्रमाणेच २०१९ मध्ये देखील १० हजारहून अधिक कोट्याधीश राहायला जातील. प्रत्येक श्रीमंत व्यक्ती सुरक्षित वातावरणात राहणे पसंत करतो. जिथे लोक धर्म, जात पात, राज्य, नोकऱ्या आणि भाषा यासाठी भांडत असतील अशा देशात राहणे श्रीमंतांना कसे आवडेल.

त्याच्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलची चिंता व्यक्त केली आहे. पुढील ५ वर्षात भारतीय अर्थव्यवस्था संकटात राहणार आहे. मोदीजी जर पंतप्रधान झाले तर डॉलर ९० रुपयापर्यंत पोहोचेल आणि गठबंधनाचे सरकार आले तर डॉलर १०० चा आकडा पार करेल. भारतात राहणाऱ्या श्रीमंतासाठी इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती आहे.

‘देशद्रोही’ हा चित्रपट कमाल आर खानने बनवला होता. बिग बॉसमध्ये देखील तो झळकला होता. वादग्रस्त विधाने करण्यासाठी तो नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. विशेष म्हणजे तो स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आहे. भारतात मतदान करण्यासाठी तो परदेशातून आला होता.

Leave a Comment