भारताच्या कुटनितीचा मोठा विजय, मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी


वॉशिंग्टन – भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या पाकिस्तानमध्ये दडी मारुन बसलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. या बाबतची घोषणा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) केली. हा भारताच्या कुटनितीचा मोठा विजय मानण्यात येत आहे. या निर्णयानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यासंदर्भात ट्विट करुन संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली आहे. मसूद अझहरचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मंजूर यादीमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्यांनी भारताला यूएनएससीत साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत. हा भारताच्या प्रयत्नांचा मोठा विजय आहे. आम्ही अनेक वर्षे यासाठी लढा दिला. हे उद्दिष्ट आज साध्य झाले, असे अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत ४ वेळा मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताकडून संयुक्त राष्ट्रांकडे प्रस्ताव मांडण्यात आला. पण प्रत्येक वेळेस चीनने व्हिटो अधिकाराचा वापर करत यामध्ये खोडा घातला होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठिंबा दिला. यामुळे चीनवर आंतराराष्ट्रीय पातळीवर राजकीय दबाव निर्माण करण्यात भारताला यश आले. अखेर चीनला आपल्या भूमिकेत बदल करत नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले. पाकिस्तानला आणि पाकिस्तानचे नागरिक असणाऱ्या दहशतवाद्यांना वारंवार वाचवणाऱ्या चीनने यू-टर्न घेतल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.

Leave a Comment