तिबेटी महिलांनी मुलांना जन्म देऊ नये असा चीनचा प्रयत्न


नवी दिल्ली – चीनविरोधात तिबेटी लोकांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर मोठ्या संख्येने निदर्शने केली. तिबेटी धर्मगुरू पंचेम लामा गेडन चौकी नईमा यांचे चीनने १७ मे १९९५ रोजी अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे लोक त्यांच्या सुटकेसाठी जंतर-मंतर येथे एकत्र आले होते. पंचेम लामा यांच्या आठवणीने येथे अनेकजण रडू लागले. चीनला दोष देत त्यांनी चीनी अत्याचारांचा पाढा वाचला.

आम्ही सर्व लोक मागील २४ वर्षांपासून चीनी अत्याचारांच्या विरोधात लढत आहेत. भारत सरकारने आम्हाला पंचेम लामा यांना चीनच्या तावडीतून बाहेर काढण्यात मदत करावी, अशी आमची विनंती आहे. पंचेम लामा तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्यानंतर हेच तिबेटींचे सर्वांत मोठे गुरु आहेत. दुसऱ्या दलाई लामांची निवड करण्याचा त्यांनाच अधिकार आहे. चीनने या कारणामुळेच त्यांना कैदेत ठेवले आहे. कारण यानंतर कोणीही तिबेटीयन धर्मगुरु बनू नये, अशी चीनची इच्छा आहे, असे समकी या निदर्शकाने म्हटले आहे.

आमच्या धर्मगुरुंचा एवढ्या वर्षांत थांगपत्ता नाही. ते जिवंत आहेत की नाहीत, हे कळायला मार्ग नाही. चीनने या काळात आमच्यावर अनेक अत्याचार केले. तिबेटी महिलांनी मुलांना जन्म देऊ नये, अशी चीनची इच्छा आहे. तिबेटी महिलांना यासाठी जबरदस्तीने चीनी युवकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. यामुळे होणारे मूल तिबेटी न म्हणवले जाता चीनी म्हणवले जावे. अशा प्रकारे तिबेटी वंश संपवला जावा, असा चीनचा प्रयत्न असल्याचे समकी यांनी सांगितले.

Leave a Comment