नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘क्लिनचीट’ दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना सैन्याच्या बलिदानासाठी भाजपला मतदान करणार का, असा प्रश्न लातूर जिल्ह्यातील औसा येथील सभेत केला होता. निवडणूक आयोगाने याला आचारसंहितेचा भंग म्हणता येणार असे स्पष्ट केले आहे. सैन्याच्या नावावर मत मागणे निवडणूक आचार संहितेचा भंग असल्याचे सांगत महेंद्र सिंह नावाच्या व्यक्तीने ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.
पंतप्रधान मोदींच्या लातूरमधील भाषणाची सीडी आणि ११ पानांच्या भाषणाच्या स्क्रिप्टची निवडणूक आयोगाच्या बैठकीत ऑनलाईन तक्रारीनंतर पडताळणी करण्यात आली. पण यातून कुठेही आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. या व्यतिरिक्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि मंत्री पीसी शर्मा यांना देखील निवडणूक आयोगाने क्लिनचीट दिली आहे. मंत्र्यांनी म्हटले होते की, बुथ जिंकून द्या, नोकरी मिळवा. मात्र आयोगाला या वक्तव्यामध्ये देखील आचारसंहितेचा भंग झाल्याचे जाणवले नाही.