लवकरच भारतीय सीमांचे संरक्षण करणार रोबोट


नवी दिल्ली – शास्त्रज्ञ मागच्या बऱ्याच काळापासून भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ असलेल्या रोबोटची निर्मिती करत आहेत. हे रोबो सुद्धा मानवी बुद्धीमतेप्रमाणे परिस्थितीनुसार काम करण्यास सक्षम असतील. या रोबोंची तैनाती देशाच्या सीमांवर गस्त घालण्यासाठी, पहारा देण्यासाठी करता येऊ शकेल. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये रोबोटच्या निर्मितीवर बंगळुरुच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या केंद्रीय संशोधन प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी काम सुरु केले. डिसेंबर २०१९ पर्यंत रोबोटचा पहिला प्रोटोटाईप म्हणजे नमुना तयार करु असा या प्रकल्पावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे. काही कठीण सैन्यदलाला ऑपरेशन्स करावे लागतात. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे बदल होईल. सीमेवर गस्त घालण्यासाठीही आमचे रोबोटस सक्षम असतील असे बीईएलचे सीएमडी गौथामा एमव्ही यांनी सांगितले.

रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अन्य उत्पादने बीईएलकडून यावर्षी बनून तयार होतील अशी माहिती संरक्षण उत्पादनाचे सचिव अजय कुमार यांनी दिली. अद्यापपर्यंत अशा कुठल्याही उत्पादनासाठी सैन्यदलांनी मागणी नोंदवलेली नाही. स्टीव्ह जॉब्स म्हणायचे जो पर्यंत तुम्ही युझरला उत्पादन दाखवत नाही. तो पर्यंत त्याला काय हवे आहे हे माहित नसते.

आमची सैन्याला उपयोगी पडतील अशी उत्पादने बनवण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प तसाच आहे असे गौथामा यांनी सांगितले. भविष्यातील युद्ध पारंपारिक पद्धतीने लढले जाणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उत्पादने निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतील. सीमेवर टेहळणीसाठी रोबोना ठेवले तर सैनिकांचे प्राण वाचू शकतात.

डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात बीईएलकडून रोबोच्या प्रोटोटाइपचा आढावा घेतला जाईल. तर चाचण्या फेब्रुवारी २०२० पासून सुरु होतील. खास आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी असलेल्या तीन प्रयोगशाळांमधील ८० वैज्ञानिक आणि अभियंते या प्रकल्पावर काम करत आहेत. सध्या एका रोबोची अंदाजित किंमत ७० ते ८० लाख रुपये आहे असे गौथामा यांनी सांगितले.

Leave a Comment