प्रज्ञा सिंहांच्या उमेदवारीला रामदास आठवलेंचा विरोध


भोपाळः साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामदास आठवले म्हणाले, प्रज्ञा सिंह यांचे नाव मालेगाव बॉम्बस्फोटात होते आणि या प्रकरणात तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याकडे सबळ पुरावे होते. करकरे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी करकरे यांच्या संदर्भात दिलेल्या विधानाशी मी सहमत नाही. त्यांच्या त्या विधानाचा मी निषेध करतो. आता न्यायालयाने ठरवायचे आहे काय योग्य आणि काय अयोग्य आहे.

करकरे 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, कारण 2008मध्ये मालेगाव स्फोटाच्या चौकशीदरम्यान त्यांनी माझा छळ केला होता, तेव्हा मी त्यांना शाप दिला होता, असे प्रज्ञा सिंह म्हणाल्या होत्या. सध्या जामिनावर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या बाहेर आहेत. त्यावर आठवले म्हणाले, आमच्या पक्षाला जर निर्णय घ्यायचा असता तर त्यांना आम्ही कधीच उमेदवारी दिली नसती.

आठवलेंनी लोकसभा निवडणूक 2019वरही भाष्य केले. 350 जागा यंदाच्या निवडणुकीत एनडीए जिंकणार आहे. पुन्हा सत्तेवर मोदी सरकार आल्यास मला चांगल्या दर्जाचे मंत्रिपद मिळेल. पत्रकारांनी त्याच दरम्यान तुम्हाला संरक्षण मंत्री केल्यास तुम्ही पाकिस्तानबद्दल काय भूमिका घ्याल, असे विचारले. त्यावर शेजारील देशांनी भारतावर हल्ला केल्यास आम्ही त्यांना हल्ल्यानेच प्रत्युत्तर देऊ, असे आठवले म्हणाले.

Leave a Comment