
मुंबई – सोमवारी सकाळी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ जागांसाठी मतदान पार पडले. राज्यातील हा अखेरचा टप्पा असून मुंबई, ठाण्यासह १७ मतदारसंघांतील ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य यात सुमारे तीन कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत. राज्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५२.९७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
चौथ्या टप्प्यात राज्यात सरासरी ५२.९७ टक्के मतदान
शिवसेनेसाठी ही निवडणूक मुंबई-ठाण्यात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शांततेत पहिल्या तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असले तरी चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक मतदारसंघात होणाऱ्या अटीतटीच्या लढती लक्षात घेऊन आयोगाने तब्बल ८७२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. कडेकोट बंदोबस्तात सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेता आमिर खान, अभिनेत्री माधुरी दीक्षित- नेने, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आदी कलाकारांनी मुंबईत सकाळी मतदानाचा हक्क बजावला.
