राज ठाकरेंनंतर आता केजरीवालही म्हणणार ‘लाव रे तो व्हिडिओ’


नवी दिल्ली – मोदी सरकारचे अपयश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या अफलातून ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या अनोख्या सभांमधून चव्हाट्यावर आणले. आता राजधानी दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी तशाच प्रकारचे अभियान सुरू करणार आहे. दिल्लीकरांचे मोदी सरकारच्या अनेक क्षेत्रातील चुकीच्या निर्णयांमुळे कसे हाल होत आहेत हे आप जनतेला दाखवून देणार आहे.

दिल्लीकरांचे दैनंदिन जीवन मोदी सरकारच्या लोक विरोधी धोरणांमुळे मुश्किल झाले असून आम्ही ते दाखवून देणार आहोत, असे आपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले. दररोज माध्यमांपुढे आप आणि दिल्ली सरकार प्रत्येक क्षेत्रांमधील निर्णय आणि त्याबद्दलची आकडेवारी उघड करणार आहेत.

दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारचे निर्णय या माध्यमातून तुलना केली जाणार आहे. केंद्राचे निर्णय यातून कसे सामान्य दिल्लीकरांसाठी चुकीचे होते हे दाखवण्यात येणार आहे. मेट्रो भाडेवाढ, एमसीडीचे दिल्ली स्वच्छ ठेवण्यातील अपयश, वीज दरवाढ, प्रदूषण, जीएसटी, नोटबंदी अशा महतत्वाच्या विषयांवर आप सरकार आकडेवारी जाहीर करणार आहे.

भाजपने दिल्लीसाठी जाहीरानामा बनवण्यापासून आधीच पळ काढला आहे. कारण त्यांनी आधी दिलेली आश्वासने पुर्ण केली नाहीत. त्यांना जनता त्यांच्या आधीच्या आश्वासनांबद्दल प्रश्न विचारेल असे, आप नेत्याने सांगितले. १२ मे रोजी दिल्लीमध्ये लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सात मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. तर २३ मे रोजी निकाल जाहीर होईल.

Leave a Comment