मनसेचा भाजपसाठी 56 मार्कांचा पेपर, 2 दिवसांचा अवधी


नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकही उमेदवार उभा केला नसला, तरी त्यांनी मोदी-शहा मुक्त भारत ही घोषणा देत महाराष्ट्र पिंजून काढला. राज ठाकरे यांनी राज्यभरात ठिकठिकाणी एकूण दहा सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांविरोधात प्रचार केला. नाशिकमध्ये राज ठाकरेंची शेवटची प्रचारसभा पार पडल्यानंतर, मनसैनिक आता कामाला लागले आहेत. राज ठाकरेंवर भाजपकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसैनिक सरसावले आहेत.

राज ठाकरेंच्या प्रचारसभांमधील मुद्द्यांना बळ देण्यासाठी नवी मुंबई शहरातील मनसेने अनोखी शक्कल लढवली आहे. मनसेने भाजपच्या नेत्यांना 56 इंचाची प्रश्नपत्रिका तयार करुन, दोन दिवसात प्रश्नपत्रिका सोडवण्याचे जाहीररित्या आव्हान दिले आहे.

56 गुणांची प्रश्नपत्रिका आम्ही प्रकाशित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजपला दोन दिवसांचा आम्ही अवधी देतो, प्रश्नपत्रिका त्यांनी सोडवून दाखवावी. तसेच, राज साहेबांच्या प्रश्नांना आशिष शेलारांना उत्तर देता आले नाही, किमान ही प्रश्नपत्रिका तरी सोडवावी, असे आव्हान नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी दिले आहे.


सर्वसामान्य शाळेतील प्रश्नपत्रिकेसारखीच नवी मुंबई शहर मनसेने प्रकाशित केलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहेत. पण, यातील एका वाक्यात प्रश्न, पर्यायी प्रश्न, रिकाम्या जागा भरा, संदर्भासहित स्पष्टीकरण इत्यादी अगदी हटके आहेत. प्रत्येक प्रश्नातून भाजपची गोची होताना दिसतेच, सोबत टोलेही लगावले आहेत. या प्रश्नपत्रिकेची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे.

Leave a Comment