नवी दिल्ली : आजच्या घडीला महेंद्रसिंह धोनीचे नाव भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून चटकन तोंडावर येईल. भारताने 1983 नंतर प्रथमच विश्वचषक जिंकला, तो धोनीच्या नेतृत्वाखालीच, तत्पूर्वी भारताला 2007मध्ये धोनीने टी-20 विश्वचषक जिंकून दिला. धोनी सध्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त असला तरी तो अडचणीच्या काळात संघासाठी धावून येतो आणि अनेकदा याची प्रचिती आलेली असल्यामुळेच धोनीचे कौतुक करण्याचा मोह 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना आवरता आलेला नाही.
कपिल देव पुढे म्हणाले, मी धोनीविषयी काय बोलू…उत्तमरित्या देशाची सेवा त्याने केली आहे आणि त्याचा आदर करायलाच हवा. आणखी किती काळ तो खेळेल हे कुणीच सांगू शकत नाही आणि त्याचे शरीर कितीकाळ कामाचा ताण पेलेल, हेही सांगणे अवघड आहे. पण, धोनी एवढी क्रिकेटसेवा कुणालाही जमणार नाही. त्याचा त्यासाठी आदर करायला हवा आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आशा करतो की तो हाही विश्वचषक जिंकेल.
विराट कोहलीला विश्वचषक जिंकणे सोपी गोष्ट नसल्याचे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 400 हून अधिक विकेट आणि 5000 धावा करणारे एकमेव खेळाडू असलेल्या कपिल देव यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. पण, विश्वचषकातील भारतीय संघाची वाटचाल तितकी सोपी नाही. त्यांना एकसंघ होऊन खेळ करावा लागेल. संघातील एकाही खेळाडूला दुखापत होऊ नये ही अपेक्षा. त्यांना नशिबाची साथ मिळाल्यास, विजय पक्का मिळेल.