मोदींकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन

narendra-modi
नवी दिल्ली – भोपाळमधून शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केले आहे. गेल्या 5 हजार वर्षांपासून जगात ज्या महान संस्कृती आणि परंपरेने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा संदेश दिला. ‘सर्वे भवन्तु सुखिन:’ हा संदेश दिला. ‘एकम् सद् विप्रा: बहुधा वदन्ति’चा संदेश ज्या संस्कृतीने दिला. तुम्ही त्या संस्कृतीला दहशतवाद ठरवून मोकळे झालात. प्रज्ञासिंह यांना उमेदवारी या सर्वांना उत्तर देण्यासाठी देणे हे एक प्रतिक असून काँग्रेसला हे आरोप महागात पडणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

माझ्याच शापामुळे महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे हे दहशतवादी हल्ल्यात मारले गेले, असे धक्कादायक वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एका सभेत केल्यानंतर वाद निर्माण झाला. प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. प्रज्ञा सिंह यांनी अखेर माफी मागत आपले वक्तव्य मागे घेतले. भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी का दिली, असा प्रश्नही विरोधक विचारत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे.

समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणाचा निकाल आला आहे. त्यात काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये हत्या झाली, त्यांच्या मुलाने त्यावेळी म्हटले होते की मोठे झाड जेव्हा पडते त्यावेळी जमीनही हादरते. देशभरात यानंतर शीखांवर हल्ले सुरु झाले. हा दहशतवाद नव्हता का?, त्याच व्यक्तीला यानंतर पंतप्रधानपदी बसवण्यात आले, माध्यमांनी त्यावेळी प्रश्न उपस्थित केले नाही, असे मोदींनी म्हटले आहे. अमेठी आणि रायबरेली येथील उमेदवार जामिनावर आहेत, पण त्यांची चर्चा होत नाही. पण भोपाळमधील उमेदवार जामिनावर बाहेर असतील त्यावरुन वाद निर्माण केला जातो, असा आरोपही मोदींनी केला.

मोदी पुढे म्हणाले की, त्यावेळी अनेक शीखांना जिवंत जाळण्यात आले आणि या घटनांचे साक्षीदारही आहेत. पण खासदारकी या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना देण्यात आली आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपदी यातील एकाला तर आता बसवण्यात आले. न्यायालयाने ज्या लोकांना शिक्षा सुनावली आहे, लोक त्यांना तुरुंगात जाऊन भेटतात. रुग्णालयात जाऊन भेटतात. अशा लोकांना तत्वांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे मोदींनी सांगितले.

Leave a Comment