सी-व्हिजील अॅपवर आचारसंहिता भंगाच्या ३ हजार तक्रारी

cvigil
मुंबई – आचारसंहिता भंग केल्याच्या अनेक तक्रारी राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून येत आहेत. आचारसंहिता भंग करणाऱ्या तक्रारी ज्या अॅपद्वारे करू शकतो, अशा सी-व्हिजिल अॅपवर नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत आतापर्यंत ३ हजार २११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

त्यापैकी १ हजार ८६६ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून, जिल्हा स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. अनधिकृत दारू, मतदारांना अमिष म्हणून दारुचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी या अ‍ॅपवर प्राप्त झाल्या आहेत.

राज्यात आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडीत इतर स्वरुपाचे १५ हजार ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भारतीय दंड संहितेच्या विविध कालमांतर्गत ३३७ गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत ४८ गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक असे १३ हजार ७०२ गुन्हे, बेकायदेशीररित्या शस्त्र, जिलेटीन व इतर स्वरूपाचे स्फोटक पदार्थ बाळगणे आदींबाबत ६०१ गुन्हे त्यामध्ये दाखल आहेत.

त्याचबरोबर नशेचे पदार्थ बाळगल्याबाबतचे १११, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत १२ गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत ५२, इतर ९ गुन्हे आदींचा समावेश आहे. शस्त्र परवानाधारकाकडून ४० हजार ९७ शस्त्रे आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली ३० शस्त्रे जप्त करण्यात आली असून, १३५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय शस्त्र अधिनियमांतर्गत १३५० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस, प्राप्तिकर, अबकारी कर विभागांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. या विभागांकडून आतापर्यंत ११८ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ४४ कोटी २२ लाख रुपये रोकड, २२ कोटी ५ लाख रुपये किमतीची २८ कोटी ४७ लाख लिटर दारु, ६.३० कोटी रुपयांचे मादक पदार्थ, ४५.४७ कोटी रुपयांचे सोने,चांदी व इतर मौल्यवान जवाहिर यांचा समावेश आहे.

Leave a Comment