नाशिक – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकमधून हद्दपार करा असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता भुजबळांनी संन्यास घ्यायला हवा. कारण त्यांना सभा दिसली की बळ येते आणि कोर्टाची तारीख आली की छातीत कळ येते, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होते. त्यांनी यावेळी भुजबळांवर जोरदार टीका केली. पंढरपूरची वारी न करता भुजबळांनी तुरुंगवारी भोगली आहे. नाशिककर अशांना मतदान करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. महायुतीचाच उमेदवार नाशिक मतदारसंघातून निवडून येईल असा दावाही संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला.
तुरुंगवीर नाशिकमध्ये उभे आहेत. पण आत्ता त्यांचा पत्ताच नाही. ते तुरुंगातील भत्ता खाऊन जॉगिंग ट्रॅकवर फिरत वजन कमी करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. त्यांच्या आत्मविश्वासाला दाद द्यायला पाहिजे. अंधार समोर दिसत असतानाही शाहिस्तेखान आणि अफजलखानाला युद्ध करायची ताकत होती आणि त्यानंतर भुजबळ यांच्यात असल्याचा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन संजय राऊत यांनी केले.