जयपूर – रामदेव बाबा यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपचा जोरदार प्रचार केला होता. पण यावेळीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून स्वतःला अलिप्त ठेवले होते. पण रामदेव बाबा आता पहिल्या दोन टप्प्यानंतर भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी पुन्हा परतले आहे. जयपूर लोकसभा मतदार संघातून केंद्रीयमंत्री राजवर्धन राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रामदेव बाबा यावेळी उपस्थित होते. मोदींना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी रामदेव बाबा पुन्हा परतले
नरेंद्र मोदी यांना २०१९ मध्ये पुन्हा एकदा आशिर्वाद द्यावा लागणार आहे. देश त्यांच्याच हातात सुरक्षित आहे. जवानांचे भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे. शेतकऱ्यांची शेती, शिक्षण, आरोग्य व्यवस्था, महिलांची अब्रु सुरक्षित आहे. त्याचबरोबर देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी मोदींनी घेतली असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले.
एखाद्या व्यक्तीची गोष्ट लोकसभा निवडणुकीत नसून व्यक्तीमत्वाची आहे. व्यक्तीमत्वाची आपण कायम उपासना केली आहे. चित्राची नव्हे तर चरित्राची उपासना केल्याचे सांगत रामदेव बाबांनी मोदींची प्रशंसा केली आहे. तत्पूर्वी रामदेव बाबा यांनी भाजपपासून सुरक्षित अतंर ठेवल्याचे वृत्त आले होते. पण रामदेव बाबा या सर्व चर्चांना पूर्णविराम देत भाजपसाठी पुन्हा एकदा प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्याचे चित्र आहे.