भारतात भाजपची सत्ता आल्यास पाकिस्तान करणार जल्लोष !

imran-khan
इस्लामाबाद – भाजपकडून लोकसभा निवडणुकांदरम्यान केल्या जाणाऱ्या प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा सर्वात महत्वाचा असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी विविध प्रचार सभांमध्ये दावा केला की काँग्रेसचा निवडणुकीत विजय झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील. पाकिस्तान काँग्रेसच्या विजयाने खुश होईल असे भाजपच्या वतीने सांगितले जाते. पण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत केलेल्या वक्तव्याने खरी परिस्थिती याहून उलट असल्याचे समोर आले आहे. भारतात पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुद्धा काँग्रेस नको आहे. मोदी सरकार लोकसभा निवडणुकीत पुन्हा विजयी व्हावे अशी इम्रान खान यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

नुकताच परदेशी पत्रकारांशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संवाद साधला. भारतात यावेळी लोकसभा निवडणुकीवर बोलताना इम्रान खान यांनी मोदींचे समर्थन केले. मोदींची पुन्हा सत्ता आल्यास काश्मीरचा मुद्दा सोडवला जाऊ शकतो. काश्मीरच्या मुद्द्याला काँग्रेस किंवा विरोधी पक्षांची सत्ता आल्यास ते हात घालणार नाहीत. उजव्या विचारसरणीच्या भाजपला घाबरून काँग्रेसचे नेते काश्मीरवर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी तयारच होणार नाहीत असे इम्रान यांना वाटते. याच दरम्यान त्यांनी भारताच्या दहशतवादविरोधी कारवायांचे समर्थन केले आहे. इम्रान म्हणाले, चर्चेतूनच काश्मीरचा मुद्दा हा सोडवला जाऊ शकतो. यावर लष्करी मार्गातून किंवा सशस्त्र उठावातून समाधान काढता येणार नाही. अशात काश्मीरात पाकिस्तानचे दहशतवादी जात असतील तर भारतीय लष्कर त्यांच्यावर कारवाई करणारच आहे.

मोदी पुन्हा सत्तेवर येण्याची इच्छा खान यांनी व्यक्त केली तरीही त्यांची धोरणे आणि निवडणुकीतील आश्वासने भयभीत करणारी असल्याचे म्हटले आहे. काश्मीरच नव्हे, तर देशभरातील मुस्लिमांच्या मनात मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मोदींच्या प्रचार सभेत सुद्धा याची झलक दिसून येते. त्यांनी पुन्हा भाजपची सत्ता आल्यास काश्मीरींना विशेषाधिकार देणारी कलम 370 रद्द करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. परंतु, भाजपकडून हा केवळ एक निवडणुकीचा स्टंट देखील ठरू शकतो यात वाद नाही असे इम्रान खान यांनी सांगितले.

Leave a Comment