१५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिलेच नाही

rajnath-singh
नवी दिल्ली – कधीच लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन भाजपने दिले नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. भाजपने कधीच १५ लाख रुपये खात्यात जमा करु असे म्हटलेले नाही. आम्ही काळया पैशाविरोधात कारवाई करु असे म्हटले होते. त्यानुसार काळया पैशाविरोधात आम्ही पाऊल उचलले.

काळा पैशाविरोधात आम्ही एसआयटीची स्थापना केली असल्याचे राजनाथ म्हणाले. भाजपवर विरोधकांकडून सातत्याने २०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी लोकांना आकर्षित करण्यासाठी खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल टीका होत आहे. राजनाथ सिंह यांनी त्या पार्श्वभूमीवर केलेले हे विधान महत्वपूर्ण आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीतील काळा पैसा परत आणणे हा महत्वाचा मुद्दा होता. भाजपने परदेशातील बेकायदा संपत्ती परत आणण्याचे आश्वासन पूर्ण केले नसल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी विरोधी पक्षातील नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयावर राजकीय सूडभावनेतून इन्कम टॅक्स आणि ईडीकडून छापेमारी सुरु असल्याचा आरोप फेटाळून लावला. या स्वायत्त यंत्रणा असून त्या त्यांच्या पद्धतीने कारवाई करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

Leave a Comment