नवी दिल्ली – अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली असतानाच फेसबुकने काँग्रेस पक्षाला दणका दिला असून काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस डिलीट केले आहेत. यासंदर्भात फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार चुकीचा मजकूर दिल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाची ही पेजेस बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर यासंदर्भातील कारवाईबाबत स्पष्टीकरण देताना ही कारवाई खोट्या बातम्यांसाठी नाहीतर चुकीचा मजकूर दिल्या प्रकरणी करण्यात आल्याचे सांगितले आहे. अशा पद्धतीन एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित पेजेसवर फेसबुककडून पहिल्यांदाच कारवाई करण्याची वेळ आहे.
काँग्रेसशी संबंधित 687 पेजेस फेसबुकने हटवले
फेसबुकचे सर्वात जास्त युजर्स भारतात असून ती संख्या 30 कोटींच्या घरात आहे. फेसबुकने सांगितले आहे की, बनावट अकाऊंट्स लोकांनी तयार केली आणि नंतर वेगवेगळ्या ग्रुप्सना जोडून मजकूर पसरवला आणि लोकांमध्ये संपर्क वाढवण्याचे काम केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्थानिक बातमी व्यतिरिक्त भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर या बनावट पेजेसवर टीका केली जात असल्याचेही फेसबुकने सांगितले आहे.
दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना काँग्रेसने खरंच ही पेजेस काँग्रेसशी संबंधित होती का याची पाहणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर या बातमी काही तथ्य आहे का तेदेखील तपासणे गरजेचे असल्याचे काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी सांगितले आहे.