पानसरेंच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचे इनाम

govind-pansare
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर जेष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगतीचा अभाव असल्यामुळे नाराजी व्यक्त केल्यानंतर गृह विभागाने लगेचच या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांसाठीच्या इनामामध्ये 50 लाखांची वाढ केली असून मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्याला आता 10 लाखांऐवजी 50 लाखांचे इनाम आता देण्यात येणार आहे,

आजपर्यंत एकूण आठ जणांच्या विरोधात पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पण संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार तपास पथकाला चकवा देत अद्यापही फरार असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. सरकारने त्यानंतर विशेष तपास पथकामधील अधिकाऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ केली. आता एसआयटीमध्ये ७ ऐवजी १७ अधिकारी असणार आहेत.

डॉ. विरेंद्र तावडे आणि गायकवाडच्या कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी चौकशीतून सारंग अकोलकर, विनय पवार यांच्यासह अन्य चार संशयितांची नावे निष्पन्न झाली होती. एसआयटीने त्यानुसार अमोल काळेला १५ नोव्हेंबर २०१८, वासुदेव सुर्यवंशीला १ डिसेंबर २०१८, भरत कुरणेला १ डिसेंबर २०१८, अमित देगवेकरला १५ जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती. मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडे यांनी कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येसाठी अमोल काळेसह चारही मारेकऱ्यांवर वेगवेगळी कामगिरी सोपवली होती. त्यांच्याकडे बॉम्बस्फोट घडविण्यासह अग्निशस्त्र चालविण्याच्या प्रशिक्षणाचीही जबाबदारी देण्यात आली होती. तर कॉम्रेड पानसरे यांचे निवासस्थान, बिंदूचौकातील कार्यालयाच्या रेकीची जबाबदारी देगवेकरवर सोपविण्यात आल्याचेही निष्पन्न झाल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात स्पष्ट केले होते.

दोषारोपपत्र या चौघांच्या विरोधात दाखल करण्यात आले आहे. सध्या दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची संख्या सध्या आठवर गेली आहे. पण संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार सर्व तपास अधिकाऱ्यांना चकवा देत अजूनही फरार आहेत. त्यामुळेच त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांसाठी 10 लाखांचे बक्षिस ठेवण्यात आले होते, ते आता 50 लाख करण्यात आले आहे.

Leave a Comment