वाराणसीतून मोदींना आव्हान देणार तामिळनाडूतील 111 शेतकरी

farmers
तिरुचिरापल्ली : तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केल्यानंतर आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच राज्यातील शंभरहून अधिक शेतकरी आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय या 111 शेतकऱ्यांनी घेतला आहे. ही माहिती तामिळनाडूचे शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी दिली.

आपल्या जाहिरनाम्यात भाजपने शेतीमालाला योग्य दरासह इतर मागण्यांचा समावेश करावा यासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे अय्याकन्नू यानी स्पष्ट केले. आमच्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात देताच, आम्ही मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेऊ. पण आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही आमचा निर्णय कायम ठेवू आणि मोदींविरोधात निवडणूक लढवू, असे अय्याकन्नू यांनी सांगितले.

2017 मध्ये दिल्लीत तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी अय्याकन्नू यांच्या नेतृत्त्वात 100 हून अधिक दिवस आंदोलन केले होते. तुमच्या मागण्यांचा काँग्रेससह इतर पक्षांनीही जाहीरनाम्यात समावेश केलेला नाही, मग भाजपकडेच ही मागणी का करत आहात, असे विचारले असता अय्याकन्नू म्हणाले की, भाजप सध्या सत्ताधारी आहे आणि मोदी पंतप्रधान आहेत. भाजप किंवा पंतप्रधानांविरोधात आम्ही नाही. मोदींनी सत्तेत येण्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. आमचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. ते आजही आमचे पंतप्रधान आहे आणि भाजप सत्ताधारी पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करत असल्याचे अय्याकन्नू यांनी सांगितले.

Leave a Comment