नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 185 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहिर केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत, तर नितीन गडकरी नागपूरमधून आणि लखनौमधून राजनाथ सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
त्याचबरोबर स्मृती इराणी अमेठीतून, हेमा मालिनी यांना मथुरामधून उमेदवारी देण्यात आली आहे. उन्नावमधून साक्षी महाराजांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच साक्षी महाराजांनी आपल्याला तिकीट दिले नाही तर त्याचे परिणाम वाईट होतील, असे वक्तव्य केले होते. त्यामुळेच साक्षी महाराजांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
महाराष्ट्रातील केवळ १६ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने १४ विद्यमान खासदारांनाच तिकीट दिले असून केवळ २ जागांवरच नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. यामध्ये लातूरमध्ये सुधाकर राव शिंगारे आणि अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.