नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने तामिळनाडूतील विद्यार्थ्यांशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी साधलेला संवाद हे आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचे त्यांना क्लीन चीट दिली आहे. यासंबंधीची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. आपल्या अहवालात तामिळनाडूचे मुख्य निवडणूक आयुक्त सत्यव्रत साहू यांनी म्हटले आहे की, चेन्नई येथील स्टेला मॅरिस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला होता. स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तक्रारीनंतर चौकशी केली. आचारसंहितेचे उल्लंघन केले नसल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे.
निवडणुक आयुक्तांच्या या अहवालानुसार, आयोगाच्या परवानगीनंतरच महाविद्यालयाच्या प्रशासनाने १३ मार्च रोजी राहुल यांचा विद्यार्थ्यांबरोबरील कार्यक्रम आयोजित केला होता. पूर्वपरवानगी घेतल्याने हा आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही. दरम्यान, साहू यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अग्रिम अहवाल राहुल यांनी या कार्यक्रमात भाषण केल्याप्रकरणी मागितला आहे.