मसूदच्या सुटकेच्या निर्णयाला सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी देखील मान्यता दिली होती

amit-shah
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या एका ट्विटमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरची सुटका कोणी केली ? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या ब्लॉगमधून काही गोष्टींची त्यांना आठवण करुन दिली आहे. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी विमान अपहरणाच्या घटनेनंतर सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे दोघेही या बैठकीला उपस्थित होते.

त्यावेळी सर्वपक्षांनी देशाच्या भावनेचा विचार करुन मसूद अझहरची सुटका करण्याचा आणि प्रवाशांना परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याव्यतिरिक्क दुसरा पर्यायही नसल्याचे शहा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. त्यावेळच्या सरकारची ओलीस ठेवलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. राहुल गांधी हे मसूद अझहरची सुटका का केली ? हा प्रश्न उपस्थित करुन दुर्देवाने देशाची दिशाभूल करत असल्याचे शहा यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

२०१० साली संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात २५ दहशतवाद्यांची मुक्तता करण्यात आली काँग्रेस नेत्यांनी त्याबद्दल देशाला सांगावे. सुटका केलेल्या दहशतवाद्यांपैकी शहिद लतीफ हा दहशतवादी पठाणकोट हल्ल्यात सहभागी होता असा दावा अमित शहा यांनी केला. कंदहार विमान अपहरणाला राहुल गांधी राजकीय मुद्दा बनवणार असतील तर रुबिया सईदसाठी १० दहशतवाद्यांची सुटका करण्यात आली त्याबद्दलही बोलावे. तत्कालिन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या रुबिया सईद कन्या आहेत.

Leave a Comment