स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा श्रीसंतला दिलासा

sreesanth
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेल्या क्रिकेटपटू श्रीसंतला काहीअंशी दिलासा दिला आहे. बीसीसीआयला श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. बीसीसीआयने आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. पण आता बीसीसीआयने या आजीवन बंदीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करावा आणि ३ महिन्यांच्या आत याबाबतचा निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

२०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून श्रीसंतला दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता, पण श्रीसंतने आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले होते. पण आपण पोलिसांच्या भीतीने आपण हा गुन्हा कबूल केल्याचा दावा काही दिवसांपूर्वी श्रीसंतने केला होता.

दिल्ली पोलिसांनी आपल्या कुटुंबाला गोवण्याची तसेच छळ करण्याची धमकी दिल्यानेच आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबूल केला असल्याचे सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतने सांगितले होते. स्पॉट फिक्सिंगच्या काळात श्रीसंतची वर्तवणूक योग्य नव्हती, असा ठपका सर्वोच्च न्यायालयाने ठेवला. आपल्यावर बीसीसीआयकडून लावण्यात आलेली बंदी अत्यंत कठोर असून आपण बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता, असेही श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले होते.

एवढी कठोर शिक्षा कोणत्याही क्रिकेटपटूला झाली नसल्याचे सांगत श्रीसंतने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचे उदाहरणही दिले होते. मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या मोहम्मद अझरुद्दीनला क्रिकेट प्रशासनावर पुन्हा येण्याची तसेच हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची बीसीसीआयकडून परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती त्याचे वकील सलमान खुर्शिद यांनी खंडपीठाला दिली होती. त्यामुळे जर अझरुद्दीनला पुन्हा संधी मिळू शकते तर श्रीसंतला का नाही? असा सवाल श्रीसंतच्या वकिलांनी उपस्थित केला होता.

Leave a Comment