काही झाले तरी पाकिस्तानसोबत भारताला खेळावेच लागेल : आयसीसी

team-india
मुंबई : आयसीसीने बीबीसीआयची यंदा इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या विश्वचषकातून पाकिस्तान संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी फेटाळून लावली असून अशा कारणासाठी आयसीसीच्या नियमावलीमध्ये एखाद्या संघाला बहिष्कृत करण्याचा कोणताही नियम नसल्यामुळे आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयच्या या मागणीला पाठींबा मिळाला नाही.

भारताने 14 फेब्रुवारीच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर क्रिकेटच्या मैदानावरही पाकिस्तानला घेरण्याची तयारी सुरु केली. बीसीसीआयने आयसीसीला दहशतवाद पसरवणाऱ्या देशांना बहिष्कृत करण्यासंबंधीचे पत्र पाठवले होते. भारताचा रोख त्या पत्रात पाकिस्तानकडे होता.

दरम्यान 16 जूनला भारत आणि पाकिस्तान संघांत विश्वचषकाचा साखळी सामना होणार आहे. पण बीसीसीआयने अद्याप या सामन्यात पाकशी खेळण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. भारताने जर हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानला संपूर्ण गुण मिळतील आणि भारतीय संघाचे नुकसान होईल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Leave a Comment