मंगळवारी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे बॉम्बफेक करून ३५० दहशतवाद्यांचा खात्मा करताना जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनाची प्रशिक्षण शिबिरे उध्वस्त केली आणि बालाकोट पुन्हा एकदा चर्चेत आले. या भागाला ऐतिहासिक महत्व आहे आणि यापूर्वीही याच भागात तथाकथित जिहादीचा सुफडा साफ करण्यासाठी महाराज रणजीतसिंग याच्या फौजेने बालाकोटवर हल्ला करून जिहादीचा पाडाव केला होता. म्हणजे गेली २०० वर्षे बालाकोट हे दहशतवाद्यांचे ठिकाण राहिले आहे.
१८३१ साली महाराजा रंजीसिंग यांच्या फौजेने सैयद अहमद बरेलवी याला ठार करून पेशावर शहरावर कब्जा केला होता. दक्षिण आशियातील हा कथित जिहादीचा पहिला अड्डा होता. सैयद अहमद शाह याने स्वतःला इमाम घोषित केले होते आणि पहिला जिहाद त्याने पुकारला होता. त्याला भारतीय उपमहाद्वीपावर इस्लामचे राज्य हवे होते. १८२४ ते १८३१ पर्यंत हे जिहादी बालाकोट मध्ये सक्रीय होते आणि महाराजा रणजीतसिंग यांच्या विरोधात शह म्हणून ब्रिटीश सरकारची त्यांना फूस होती. त्यामागे सैयदने महाराजा रणजीतसिंग याच्या शीख राज्याला सतत उपद्रव द्यावा आणि ते कमजोर करावे असा ब्रिटीशांचा उद्देश होता. त्यामुळे ब्रिटीश सैयदच्या जिहादी कारवायांकडे लक्ष देत नसत.
अखेर महाराजा रणजीतसिंग यांच्या फौजा बालाकोट येथे घुसल्या आणि त्यांनी या तथाकथित जीहादींचा समूळ नायनाट केला. आजही या भागात या जिहादी लोकांच्या कबरी असून पाकिस्तानी त्या कबरी पवित्र मानतात.