
राजौरी – भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळावर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान पूर्णपणे बिथरले असून पाककडून सीमेवर गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने मंगळवारी १२ ते १५ ठिकाणी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. भारताचे ५ जवान पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत.
पाकच्या कुरापती सुरुच; लष्कराच्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार
दरम्यान दूसरीकडे जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा यात खात्मा करण्यात आला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास शोपियाँतील मेमरेंड परिसरात ही चकमक सुरू झाली होती. तर दुसरीकडे सातत्याने सीमेपारहून शस्त्रसंधीचे उल्लंघन होताना दिसत आहे. भारतीय हवाई दलाच्या एरियल स्ट्राइकनंतर तीळपापड झालेले पाकिस्तानी लष्कर भारतातील ग्रामीण भागातील घरांवर तोफांचा मारा करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्हीकडून गोळीबार थांबला असून सुरक्षादलाकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
