आयसीसीची आचार संहिता भंग केल्याप्रकरणी २ वर्षांसाठी जयसूर्याचे निलंबन

sanath-jaysuriya
दुबई : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला आयसीसीने दणका दिला आहे. जयसूर्याचे आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आचार संहिता भंग केल्याप्रकरणी २ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. जयसूर्यावर आयसीसीच्या २.४.६ आणि २.४.७ च्या कलमानुसार ही कारवाई झाली. कलम २.४.६ मध्ये आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या चौकशीला मदत केली नाही. तसेच पथकाने मागितलेली माहिती आणि कागदपत्र न देणे आणि २.४.७ मध्ये भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या चौकशीत अडथळे निर्माण करणे, तसेच माहिती लपवणे, तपासासाठी महत्त्वाची असणारी कागदपत्र गहाळ करणे याचा समावेश होतो.

श्रीलंका क्रिकेट संघाचे सनथ जयसूर्याने १९८९-२०११ पर्यंत प्रतिनिधीत्व केले आहे. २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत जयसूर्याने ११० कसोटी आणि ४४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. जयसूर्या श्रीलंकेचा माजी खासदारही आहे. सनथ जयसूर्या हा श्रीलंकेच्या निवड समितीचा माजी अध्यक्षही होता. सनथ जयसूर्या हा सध्या क्रिकेट खेळत नाही, पण तरी त्याच्यावर आयसीसीने ही कारवाई केली आहे. ही कारवाई झाल्यामुळे सनथ जयसूर्या पुढची २ वर्ष आयसीसीशी संलग्न असणाऱ्या कोणत्याही संस्थांमध्ये कोणतेही पद भुषवू शकणार नाही.

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना जयसूर्याने हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. अंतर्गत माहितीचा गैरवापर, भ्रष्टाचार व सट्टेबाजी याबद्दल आयसीसीकडे त्याच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे जयसूर्याचे म्हणणे आहे. जयसूर्याने सांगितले की, तो नेहमीच उच्च दर्जाचे खेळ खेळत असे. पुढे तो म्हणाले, मी नेहमीच देशाला प्रथम ठेवले आणि क्रिकेटप्रेमी याचे साक्षीदार आहेत. श्रीलंका आणि चाहत्यांचे आभार मानतो, जो या कठीण काळात माझ्याबरोबर उभे आहेत.

Leave a Comment