नवी दिल्ली – मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जाभामधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर भारतीय हवाई दलाने हवाई हल्ले करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 हुन अधिक जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत भारताने जवळपास 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
दरम्यान पाकने सुरुवातील हल्ला झालाच नसल्याचा कांगावा केल होता. पण या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याची एक ऑडिओ क्लिप समोर आल्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. यासंदर्भात टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मसूद अझहरने या ऑडिओ टेपमध्ये भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. पाकिस्तान हल्ला झाल्यानंतर वारंवार भारतीय हवाई दलाने निर्जनस्थळी बॉम्ब टाकून पळ काढल्याचा दावा केला होता. पण पाकिस्तानचा हा दावा हाफिज सईदच्या ऑडिओ क्लिपमुळे फोल ठरला आहे.
ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाने मसूद अझहरचे अनेक नातेवाईक बेपत्ता असल्याची माहिती दिली असल्याचेही टाइम्स नाऊने वृत्तात सांगितले आहे. मसूद अझहरचे दोन भाऊ आणि मेहुणा भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत. हल्ला झाला त्यावेळी हे सर्वजण दहशतवादी तळावर उपस्थित होते.
दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असा सल्ला दिला आहे. भारताच्या हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँतोनियो गुतेरेस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम बाळगावा असे म्हटले आहे.