
इस्लामाबाद – भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या एरियल स्ट्राईकनंतर पाकच्या तोंडचे पाणी पळाले आहे. भारताने आमच्यावर गंभीर हल्ला केला असल्याचे म्हणत आम्हीही स्वरक्षणासाठी भारताला प्रत्युत्तर देऊ असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी बरळले आहे.
पाकचा परराष्ट्र मंत्री बरळला- स्वरक्षणासाठी आम्हीही भारताला प्रत्युत्तर देऊ
भारताने एलओसीचे उल्लंघन केले असून भारताविरोधात आम्ही कडक पाऊल उचलू आणि स्वरक्षणासाठी प्रत्युत्तर देऊ, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. पाक परराष्ट्र मंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे या हल्ल्यानंतर आणखीन काही घडामोडी घडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ल्याची माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असल्याचे कुरेशी म्हणाले. भारताचा हा गंभीर हल्ला आहे, याबद्दल आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे तक्रार करणार आहोत. पाकिस्तानही भारताला ‘योग्य’ प्रतिक्रिया देईल, असे ते म्हणाले.
