
ठाणे – अवघ्या काही महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यातच लोकसभेच्या 47 जागा लढवण्याची घोषणा नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाने केली आहे. या संदर्भातील माहिती पक्षाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात महाराष्ट्र क्रांती सेना
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा या पक्षाला पाठिंबा असल्याचा दावा महाराष्ट्र क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. साताऱ्याची जागा ही पक्षाच्या वतीने उदयनराजे यांच्यासाठी सोडण्यात आली आहे. उदयनराजे या पक्षातून निवडणूक लढवणार नसले तरी राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र क्रांती सेनेकडून व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याची परिस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजासाठी भाजपने केवळ आश्वासनांचे गाजर दिले असून कमळावर बहिष्कार टाकून राज्यभर गाजर वाटण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरकारच्या विरोधात गाजर दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. ठाणे लोकसभा मतदार संघासाठी रवींद्र साळुंखे तर मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून उल्हास पाटील लोकसभा लढवणार आहे.
