नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तब्बल 12 दिवसानंतर वचपा काढला आहे. हवाई दलाने एलओसीजवळ पाकव्याप्त काश्मिरमधील जैशच्या दहशतवादी अड्यांवर हल्ला चढवला. तेथील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई दलाने 1 हजार किलोचे बॉम्ब फेकले आहेत. हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारीला सकाळी 03:30 वाजता हा हल्ला करण्यात आला.
हवाई दलाने ही कारवाई पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट, चकोटी आणि मुझफ्फराबाद येथे केली असून हा हल्ला भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांच्या सहाय्याने करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत.
दरम्यान, वायू दलाचे विमान तब्बल २१ मिनिटे पाकमध्ये होते. एका विमानात ४८ बॉम्ब होते, असे सांगण्यात येते. पण याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हल्ल्याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्याचे माध्यमातून वृत्त येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हवाई दलाच्या सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.