नवी दिल्ली – सोमवारी संध्याकाळी शिवसेना आणि भाजपने संयुक्त पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्याची घोषणा केल्यानंतर दोन्ही पक्षांनी निवडणुकीसाठी आपापसात जागा वाटप करुन घेतल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दुखावले आहेत. त्यांनी या निवडणुकीत रिपाई (आ)गटासाठी एका जागेची मागणी केली आहे.
यावर आठवले म्हणाले की, युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांना आपापसात जागा वाटप करताना आमचा विसर पडला. पण या उभय पक्षांकडे आम्ही फक्त एकाच जागेची मागणी केली होती. पण त्यांनी सर्व जागा वाटून घेतल्यामुळे राज्यातील दलित समाजात नाराजी पसरण्याची शक्यता नाकारण्यात येणार नाही.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी अनुक्रमे २५-२३ असे जागावाटप जाहीर केले. यात रामदास आठवलेंच्या पक्षाचा कोणताही विचार केला गेला नाही. आठवलेंनी याच मुद्यावर जोर देताना म्हटले, की आम्हाला एक जागा मिळाली नाही तर भाजप-शिवसेनेला दलित मते मिळण्यास अडथळा येईल.