
मागच्या गुरुवारी जम्मु-काश्मिरमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या बसवर आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफच्या 45 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या भ्याड हल्लानंतर अवघ्या देशात संतापाची एकच लाट संचारली. या हल्ल्याच्या निषेधार्थ सिनेकलावंतांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याचबरोबर शहीद जवानांच्या परिवारासाठी अनेंकानी आपली मदत देऊन खारीचा वाटा उचलला. यात बीटाऊनचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार देखील मागे नव्हता. अक्षय कुमार अवघ्या दिड दिवसात शहीद जवानांच्या परिवाराच्या मदतीसाठी तब्बल 7 कोटी रुपयांचा मदतनिधी उभा केल्याचे वृत्त आहे.
अवघ्या दिड दिवसात अक्षयने शहीदांच्या परिवारासाठी जमवला ७ कोटींचा मदतनिधी
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील शहीद जवानांच्या परिवारासाठी आपल्याकडून अर्थिक मदत जाहिर केली. त्याचबरोबर भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने देखील शहीदांच्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी स्विकारली आहे. त्यातच अक्षयने देखील भारत के वीर या अॅपद्वारे शहीदांच्या परिवासाठी मदतनिधी जमा केला आहे. अक्षयने केवळ दिड दिवसात सात कोटी रुपयांचा आर्थिक मदतनिधी जमा केला असून त्याने स्वत: या निधीमध्ये पाच कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
