
चेन्नई : जसजसे तंत्रज्ञान अजुन विकसित होत तसतसे त्याचे दुष्परिणाम देखील आपल्या समोर दररोज विविध घटनांच्या माध्यमातून आपल्या समोर येतच असतात. त्यातच आताच्या घडी स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅपमुळे देखील अनेक जणांनी आपला जीव गमवाला आहे. त्यातच एक नाव आहे टिक-टॉक या व्हिडीओ अॅप. या अॅपमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 20 वर्षांखालील मुले या अॅपच्या आहारी गेली असून याचा विपरित परिणाम मुलांच्या मनावर होत आहे.
टिक-टॉक अॅपवर बंदी आणणार तामिळनाडू सरकार ?
आता याचपार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने या अॅपबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून तामिळनाडू सरकार केंद्र सरकारकडे राज्यात टिक-टॉक अॅपवर बंदी घालण्यासंबंधी मागणी करणार आहे. तामिळनाडूचे माहिती आणि प्रसारण मंत्री एम. मणीकंदन यांनी याबाबत सांगितले की, टिक-टॉक अॅप बंद करण्याच्या विचारात तामिळनाडू सरकार आहे. कारण या अॅपमुळे तामिळ संस्कृतीला कमी दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच राज्यातील अनेक राजकीय पक्षांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे ब्लू व्हेल गेमप्रमाणे या अॅपवरही बंदी आणावी.
लहान मुले आणि तरुण पिढीची या अॅपमुळे दिशाभूल होत असल्यामुळे केंद्र सरकारने या अॅपवर बंदी घालायला हवी, असे मणीकंदन म्हणाले. कायदा-सुव्यवस्थेसंबंधी समस्या टिक-टॉक अॅपमुळे उद्भवत आहेत. या अॅपसाठी लोक स्वत:चा जीवही धोक्यात घालायला तयार आहेत. या अॅपमुळे अनेकांनी आपला जीव गमावल्याची प्रकरणे समोर आली आहेत, असे अण्णा द्रमुक पक्षाचे नेते मणीकंदन यांनी सांगितले.
