ट्रिपल तलाक कायदा सत्तेत आल्यास रद्द करणार : काँग्रेस

congress
नवी दिल्ली : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीआधी मोठी घोषणा केली आहे. ट्रिपल तलाक कायदा सत्तेत आल्यास रद्द करणार असल्याचे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटले आहे. त्या दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्याक अधिवेशनात बोलत होत्या. सुष्मिता देव या सिलचरच्या खासदार आहेत.

देव यांनी यावेळी ट्रिपल तलाक कायदा करण्यामागे मुस्लीम पुरुषांना जेलमध्ये पाठवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोपही केला आहे. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला शाखेला भेटून आपण ट्रिपल तलाक कायद्याला विरोध केल्याप्रकरणी त्यांचे आभार मानले असल्याचे सुष्मिता देव यांनी सांगितले.

आज (7 फेब्रुवारी) अल्पसंख्याकांमध्ये पक्षाला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रमुख पाहुणे होते. राहुल गांधींनी यावेळी मोदी सरकावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींचा चेहरा नीट पाहिला तर तुम्हाला भीती दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले.

कोणत्याही एका धर्माचा हा देश नाही. भारतातील प्रत्येक व्यक्तीचा हा देश आहे. लढाई दोन विचारधारांमधील आहे. या देशासाठी अल्पसंख्यांकांनीही काम केले आहे. एक विचारधारा म्हणते देश सोन्याची चिमणी आहे, याचा अर्थ असा की, देश एक उत्पादन आहे. आमच्या विचारधारेनुसार, देश एक नदी आहे, ज्यात सगळ्यांना जागा मिळायला हवी.

Leave a Comment