पालघर – नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा विवाहसोहळा पार पडला. अमित यांनी फॅशन डिझायनर मिताली बोरूडे हिच्याशी लग्नाची गाठ बांधली. दिग्गज नेत्यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या या लग्नसोहळ्याला गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंकजा मुंडे, यांसह बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेतेही येथे हजर होते. आता राज यांच्या घरी अमितच्या लग्नानंतरही लगीनघाई असल्याचे दिसून येते. कारण, 500 आदिवासी मुला-मुलींच्या लग्नसोहळ्याला राज ठाकरे उपस्थित राहणार असून हा लग्नसोहळा मनसेकडून आयोजित करण्यात आला आहे.
#शेतकऱ्यांचीमनसे🌱 #कामगारांचीमनसे✊ pic.twitter.com/VFKpAVdgDa
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 7, 2019
पालघर जिल्ह्यातील गरीब, शेतकरी, मजूर आणि आदिवासी भागातील 500 जोडप्यांचा सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबाबतची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली असून शेतकऱ्यांची मनसे, कामगारांची मनसे असेही ट्विटरवर लिहिले आहे.
हा सामुदायिक विवाहसोहळा शनिवार 9 फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील खैरपाडा मैदानात संपन्न होणार आहे. या विवाहसोहळ्याचे आयोजन पालघर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, राजपुत्र अमित ठाकरेंचा विवाहसोहळ 27 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात पार पडला. या विवाहसोहळ्याची राज्यभर चर्चा रंगली होती.