
पाथर्डी – राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी अनुदानाचे पैसे मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला आधी घड्याळाचे बटण दाबा असे अजब उत्तर दिले आहे. पाथर्डी येथील जाहीर सभेत बोलताना अजित पवार यांच्याकडे एका शेतकऱ्याने पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. यावर त्यांना अजित पवारांनी सांगितले की, आधी निवडणुकीत घड्याळाचे बटण दाबा. घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता. अहो त्या कमळाबाईला विचारा ना, असे म्हटले आहे.
अनुदान मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचे अजब उत्तर
जलयुक्त शिवारच्या मुद्द्यावरुन पुढे बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. हजारो गावे जलयुक्त शिवाराने टँकरमुक्त झाले असल्याचे सांगत आहेत. कुठले गाव टँकरमुक्त झाले ते दाखवा. टँकरने पाथर्डी, शेवगावमध्ये १२३ गावांना पाणी का दिले जात आहे उत्तर द्या. या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.
अजित पवारांनी आपल्या भाषणात सरकारने चारा छावण्यांबाबत काढलेला जीआरचा समाचार घेतला एखाद्या शेतकर्याकडे पाच सहा गुरे आहेत मग पाचच्या वर गुरे असतील तर शेतकऱ्यांनी बाकीची गुरे कुठे न्यायची. म्हणजे यांचे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले तसे पाहुण्यांकडे गुरे नेवून बांधायची असेच सरकार करायला लावत आहे. तसेच हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर का उठले आहे. मंत्र्यांचे कारखाने आहेत त्यांनी एफआरपी दिली का. हे कुठल्या तोंडानी सांगणार आहात असा सवाल अजित पवारांनी विचारला.
