बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार नाईलाजास्तव दिला गेला – ओवेसी

Asaduddin-Owaisi
मुंबई – ‘एमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी आतापर्यंत किती दलित, आदिवासी, मुसलमान, गरीब, उच्च जातीतील लोक किंवा ब्राम्हणांना भारतरत्न देण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करत भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले, त्यांनी त्याचबरोबर काँग्रेसवरही हल्ला चढवला. ओवेसी यांनी यावेळी बोलताना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेल्या भारतरत्न पुरस्काराचाही उल्लेख केला. पण त्यावेळी बाबासाहेबांनाही काही मनापासून भारतरत्न देण्यात आला नाही, तर नाईलाजास्तव द्यावा लागला, असा आरोप ओवेसी यांनी केला.

ओवेसी कल्याण येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलत होते. यावेळी एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार वारिस पठाण आणि भारतीय रिपलब्किन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. देशाला राज्यघटना देऊन सर्वाना जगण्याचे समान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हक्क दिले. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. मोदी, फडणवीस आपणास न्याय देतील असा तुमचा विश्वास असेल तर तो भ्रम आहे. हे लोक तुमच्या मतांवर राज्य करून तुमच्या मुलांना तुरुंगात टाकत आहेत. या लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवाल तेवढे तुम्ही फसाल, असे ओवेसी यांनी स्पष्ट सांगितले. प्रकाश आंबेडकर यांना या यशासाठी साथ द्या. शिवसेना-भाजपचा महाराष्ट्रात पाडाव केल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचा काय मामला आहे ते समजत नाही. ते मोदींना एवढे का घाबरतात, असा प्रश्न ओवेसी यांनी केला.

विकासाचे धोरण आणि कार्यक्रम काँग्रेस, भाजप पक्षांकडे नाही. लोकांना विकासाच्या नावाखाली काँग्रेसने ७० वर्षे आणि अलीकडच्या काळात भाजपने फसवले. आता या लोकांच्या विरोधात शांत बसून नव्हे, तर पेटून उठून लढण्याची गरज असून भूलथापा मारणाऱ्या भाजप, काँग्रेससह शिवसेना पक्षाला जनतेने विसरावे, असे आवाहन ओवेसी यांनी केले.

तर यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी, संविधानाच्या माध्यमातून संघप्रणीत भाजप सरकार केंद्रात सत्तेवर आले. बहुमत नव्हते तोपर्यंत त्यांनी सहकाराची भाषा केली. चार वर्षांपूर्वी बहुमत मिळताच भाजपने आपले खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली. असे हे केंद्रातील बहुरंगी सरकार आता उखडून फेकले पाहिजे, असे आवाहन केले.

Leave a Comment