राहुल गांधींची ‘दांडी’ आम्हीच ‘गुल’ करणार – रामदास आठवले

rahul-gandhi
कल्याण – आगामी लोकसभा निवडणूक कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रातून लढणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी महाराष्ट्रातून कोठूनही निवडणूक लढवली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. पण त्यांची आगामी निवडणुकीत दांडी आम्हीच गुल करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले कल्याणमधील पोटे मैदानात आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात बोलत होते. ते यावेळी म्हणाले, देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी चांगले काम करत आहोत. पण उगाच काही लोक आमच्यामागे लागले आहेत. त्यांच्याकडून ही रणनिती आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आखली जात आहे. पण त्यांना उत्तर देण्यासाठी मोदी आणि मी सज्ज असून जनता त्यांना आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रातून लढविणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी कोठूनही निवडणूक लढवली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांची विकेट आम्हीच काढणार असे आठवले या वेळी म्हणाले.

कुठल्याही पक्षाचे चिन्ह अथवा पाठबळ न घेता निवडणुकीमध्ये जिंकणे खूप कठीण आहे. पण आमदार गणपत गायकवाड यांनी ते काम करून दाखविले. सर्वसामान्यांसाठी गायकवाड हे कार्यरत असून भाजपसोबत असून त्यांना आमचाही पाठिंबा आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती करणार असून चिंता करण्याची गरज नसल्याचे आठवले या वेळी म्हणाले.

Leave a Comment