
मुंबई : भाजपच्या केंद्रीय नेत्याने लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका स्वतंत्र होणार असल्याची बाब स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिल्यामुळे आता दोन्ही निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही !
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा सुरु असल्यामुळे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम संपवा, अशी विनंती राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक निर्णय जाहीर करतील अशी राज्यातील नेत्यांमध्ये भीती होती. पण विधानसभा-लोकसभा निवडणुका स्वतंत्र होणार असल्याचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिल्याची माहिती आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणुका यासोबत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांची (2014) घोषणा पाच मार्च 2014 रोजी करण्यात आली होती. 16 एप्रिलपासून 13 मेपर्यंत पाच टप्प्यात देशभरात मतदान झाले होते. निवडणुकांचे निकाल 16 मे रोजी जाहीर झाले होते.
