मोदींनाच जनता पुन्हा पंतप्रधानपदी बसवणार – रामदास आठवले

narendra-modi
नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदी उत्तम कप्तान असून त्यांना कोणीच हरवू शकत नाही, असे म्हटले आहे. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला विराट कोहलीने पराभूत केले, मोदीही त्याचप्रमाणे सर्वांना पराभूत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोदींना हरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न अयशस्वी होणार आहे. मोदी आणि त्यांच्या सहका-यांवर जनतेला पूर्ण विश्वास आहे. हे लोक महायुतीच्या माध्यमातून मोदींच्या विरोधात चुकीचा प्रोपगंडा राबवत असल्याची टीका देखील आठवले यांनी यावेळी केली. मोदींना जनता पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून निवडून देईल, असेही ते म्हणाले.

ओबीसी समाजातील व्यक्ती विरोधकांना पंतप्रधानपदी नको आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ते संविधान बदलतील आणि अनुसूचित जाती-जमातींचे आरक्षण काढतील, असा चुकीचा संदेश महायुतीच्या नेत्यांनी जनतेमध्ये पसरवला आहे, असे आठवले म्हणाले. आपण पंतप्रधान आंबेडकरांच्या संविधानामुळेच झालो असल्याचे मोदी यांनी म्हटले असल्याचेही आठवलेंनी सांगितले. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक चांगली कामे केली आहेत. तसेच एनडीएला २०१९मध्ये पूर्ण बहुमत मिळणार असल्यामुळे केंद्रात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

Leave a Comment