औरंगाबाद : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. आमदार जलील यांनी पंधरा दिवसापूर्वी मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. शिवाय मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करण्यात यावा, मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी याचिकेद्वारे मागणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयामध्ये यावर सुनावणी आहे. पण त्यांनी तत्पूर्वीच याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला.
सवर्णांना १० टक्के आरक्षणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे. पण लोक या दहा टक्के आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले असल्यामुळे आता १० टक्के आरक्षणाचा निर्णय नेमका काय होतो, हे आम्हाला वाट पाहावी लागणार आहे. त्यातच आता मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाबाबतच्या विविध याचिकावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आम्ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार इम्तियाज जलील यानी दिली.