‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’च्या प्रसिद्धीवर 56% निधी खर्च

narendra-modi1
नवी दिल्ली: महिला-पुरुष जन्मदर सुधारण्यासाठी आणि महिलांबद्दलचा समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेला बहुतांश निधी प्रसिद्धीवर खर्च होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सरकारने त्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूदही केली. पण केवळ प्रसिद्धीसाठी यातील तब्बल 56 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.

22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान मोदींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेची घोषणा केली. ही योजना महिला आणि बालविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयांकडून राबवली जाते. या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीपैकी तब्बल 56 टक्के निधी प्रसिद्धीवर खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य आणि जिल्हा पातळीवर एकूण निधीपैकी केवळ 25 टक्के निधी देण्यात आला आहे. तर 19 टक्के निधी खर्चच करण्यात आलेला नाही. महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी ही संपूर्ण आकडेवारी दिली. कुमार यांनी ही आकडेवारी संसदेत पाच खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.

आतापर्यंत 644 कोटी रुपयांची तरतूद ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेवर करण्यात आली आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवर यातील केवळ 159 कोटी रुपये पाठवला गेला. काही खासदारांनी कुमार यांना सरकारची ही योजना अपयशी ठरली आहे का, असा प्रश्न विचारला. मंत्र्यांनी त्याला नकारार्थी उत्तर दिले. 640 जिल्ह्यांमध्ये सरकारने ही योजना राबवल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात सरकारने स्त्री-पुरुष यांचा जन्मदर अतिशय कमी असलेल्या 100 जिल्ह्यांची निवड केली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात यात आणखी 61 जिल्ह्यांची भर पडली, अशी माहिती कुमार यांनी दिली.

Leave a Comment