
नवी दिल्ली – ईव्हीएम मशीन २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान हॅक करण्यात आल्या होत्या. निवडणुकीचे निकाल त्याद्वारे आधीच ठरविण्यात आल्याचा आरोप एका सायबर तज्ज्ञाने केला आहे. निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्टीकरण दिले असून, असा कोणताही घोटाळा झाला नसल्याचे म्हटले आहे.
२०१४ च्या निवडणुकीत कोणताही घोटाळा झालेला नाही; निवडणूक आयोग
लंडनमधून स्काईपद्वारे हा संवाद सायबर तज्ज्ञ सय्यद शुजा याने साधला होता. शुजाच्या काही सहकाऱ्यांचा खून झाला. त्यामुळे भारतात त्याला असुरक्षित वाटायला लागले. २०१४ साली त्याने या कारणाने भारत सोडला, असे त्याने सांगितले. या व्हीडीओमध्ये या व्यक्तीने फेस मास्क परिधान केले होते.
भारतीय जनता पक्षाला ईव्हीएम हॅक करण्यासाठी रिलायन्स जिओ या कंपनीने मदत केली. त्यांनी यासाठी कमी वारंवारतेचे तरंग (फ्रिक्वेन्सी) पुरवले असा खळबळजनक दावा शुजाने केला आहे. पण, त्याच्या या दाव्याची पुष्टी करेल असा कोणताही पुरावा त्याने दिला नाही. दरम्यान, जिओची स्थापना २०१६ च्या सप्टेंबरमध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षासोबतच समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस देखील ईव्हीएम हॅक करण्याच्या कारस्थानात गुंतल्याचे त्याने म्हटले आहे. या पक्षाकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आली नाही.
