विरोधी टोळक्याची पर्वा तोफेवर बसलेल्या मोदींनी का करावी?

samna
मुंबई – शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातील अग्रलेखातून आज विरोधकांच्या महासभेतील एकमुखी आवाजाने मोदी सरकारची तोफही थरथरली, अशी बोचरी टीका केली आहे. विरोधी टोळक्याची पर्वा तोफेवर बसलेल्या मोदींनी का करावी? असा सवालही केला आहे.

आपल्या एकजुटीचे दर्शन २२ विरोधी पक्षांनी घडवले. पण सत्ताधाऱ्यांनी त्यावर टीका करण्याचे कारण काय? असा सवाल करताना शिवसेनेसह कोणी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलले तर ते लोकविरोधी, देशविरोधी होते. लोकशाहीसाठी हे चांगले नाही. जनता मुर्ख नाही त्यांना सर्वकाही समजत असल्यामुळे मोदींना हटवायचे की ठेवायचे याचा निर्णय जनता घेईल, असे शिवसेनेने म्हटले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे विरोधकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणले. शिवसेनेकडून याचे कौतुक करण्यात आले आहे. पश्चिम बंगालची ही वाघीण त्यासाठी मोदी-शहांना सळो की पळो करुन सोडत असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. कोलकात्याच्या महासभेत शिवसनेलाही यावे आणि मोदी सरकारविरोधात रणशिंग फुकावे अशी ममतांची इच्छा होती. पण आम्ही आमच्याच मैदानात आमचे रणशिंग फुकत असतो आणि ते याआधीच फुंकले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. पण महाआघाडीत पासवान, नितीशकुमार आणि आठवलेंसारखे नमुने आहेत ज्यांचा राम मंदिराला विरोध असल्यामुळे महाआघाडीला आमचा विचार झेपला नसता असेही शिवसेनेने म्हटले आहे.

मोदींनी महाआघाडीवर टीका करण्यापेक्षा विरोधकांचा भडीमार संयमाने सहन करायला हवा असा सल्लाही शिवसेनेकडून सरकारला देण्यात आला आहे. देशाचे सरकार शत्रू नाही पण त्यांनी आपले सरकार अमर असल्याच्या भ्रमात राहू नये, असा खोचक टोलाही शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. लोकविरोधाची पर्वा न करता जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने मेहबुबा मुफ्तींसोबत सत्ता उपभोगल्यानंतर स्वतःच त्यातून बाहेर पडून मुफ्ती देशविरोधी असल्याचा डांगोरा भाजप पिटत असल्याचे शिवसनेने म्हटले आहे.

Leave a Comment